गारव्यामुळे मासळीची आवक कमी : दरात वाढ

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Feb 16, 2025

नवी मुंबई( प्रतिनिधी ) :-गेल्या महिन्याभरापासून वातावरणातील गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घटली आहे.परिणामी, मासळीचे भाव देखील वाढले आहेत.

          नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठया मुळे कमी प्रमाणात मिळु लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातीला बसला जातो . त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते, त्यामुळे खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची 40 टक्केपेक्षा अधिक आवक घटली आहे. परिणामी मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. 

          नवी मुंबईतील बहुतांश मच्छिमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात.मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांना देखील भाव वाढीचा फटका बसला आहे.एकीकडे गारठा वाढला तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवक वर होतो. त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे दर ही वाढीव झाले आहेत. दिवाळे खाडी पासून ते ऐरोली खाडी पर्यंत स्थानिक मच्छिमार मासेमारी करतात .या खाडीतून मासे, निवढी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी मिळतात पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

           दरवर्षी प्रत्येक बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने कधी कधी रिकाम्या हाती परतावे लागते. उन्ह वाढले की जाळ्यात मासोळी सापडली जाते. समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रकारचे मासे गायब होऊ लागले आहेत. पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातीचे मासे मिळेनासे झाले आहेत. मांदेली आणि बोंबील, बांगडे हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेही महाग झाले आहेत. त्याचा परिणाम मासळीच्या दरवाढीवर झाला आहे.काहींना काही कारणाने मासेमारी संकटात येते. कधी समुद्रात घोगावणारे वादळ, प्रदूषण तर कधी बदलते वातावरण अशा विविध कारणाने मासळीच्या आवक वर परिणाम होत आहे.

-------------------------------------------- 

नवी मुंबईतील घातक रासायनिक सांडपाणी खाडीद्वारे समुद्रात सोडले जाते.त्यामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे मासे कमी मिळत आहेत. त्यात वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी मासळीची आवक घटली असून दर वाढले आहेत. त्यामुळे मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.

सुरेखा कोळी 

मासे विक्रेती, दिवाळे 

---------------------------------------------------

सध्याचे दर 

 सुरमई - 1100 रुपये किलो

पॉपलेट 1000 रुपये किलो

काफरी पॉपलेट - 1500 रुपये किलो

किलो कोळंबी - 700 रुपये किलो

किलो घोळ - 1300 रुपये किलो

जिताडा - 1200 रुपये किलो

हलवा - 950 रुपये किलो

------------------------------------------------------